
हम नहीं सुधरेंगे !
जनहितासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन केले. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत, आपल्या जनतेला कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून डॉक्टरी उपचारांबरोबर लोक एकमेकांच्या संपर्कात येऊ नये म्हणून सरकारला लॉकडाऊन करावे लागले. हे कुठेतरी आपण जनतेच्या भल्यासाठी करतो आहोत हे माहीत असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये सर्व भारतीय जनतेची माफी मागितली. माफी मागितली या विधानाचा पाकीस्तानचा पंतप्रधान इम्रानखान याने विपर्यास्त केला. तो म्हणाला भारतामध्ये भारतीय जनतेच्या दैनंदिन जगण्याचा कोणताही विचार न करता भारताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी घाईघाईत लॉकडाऊन केले. त्यामुळे भारतीय जनता त्यांचेवर नाराज आहे, म्हणून मोदी यांनी भारतीय जनतेची माफी मागितली. खरं म्हणजे या इम्रानखानच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. आज पाकिस्तानात कोरोनाने शिरकाव केला आहे. पाकिस्तानच्या सिंध व पंजाब प्रांतात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे.परंतु अपुरी आरोग्य व्यवस्था, डबघाईला आलेली अर्थव्यवस्था , बुरसटलेले आणि विखारी धार्मिक विचार यामुळे पाकिस्तान आजच्या घडीला कोरोनाचा सामना करू शकत नाही. आज लॉकडाऊन करण्यासाठी इम्रानखान वर पाकिस्तान मीडिया प्रचंड दबाव आणत आहे. परंतु आपण लॉकडाऊन यशस्वी करू शकत नाही हे पूर्ण माहिती असल्याने इम्रानने भारतीयांच्या पंतप्रधानाच्या माफी मागतो या विधानाचा विपर्यास्त करून पाकिस्तानी जनतेची दिशाभूल करीत आहे. एकप्रकारे इम्रानखानने आपले अपयश झाकून ठेवण्यासाठी हा भारतावर टीका करून हम नहीं सुधरेंगे हे संपूर्ण जगाला दाखवून दिले. भारताच्या पंतप्रधानावर टीका करण्याऱ्या इम्रानखानचा आम्ही जाहीर निषेध करतो.
आता दुसरी बाजू बघा, सरकारी यंत्रणा आपल्या परीने खूप चांगला प्रयत्न करीत आहे. आपल्या पेक्षा प्रगत देशांमध्ये रोज हजारोनी कोरोना संसर्गाने लोक मृत्युमुखी पडत आहेत. त्यामानाने आपल्या केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी ज्या जलद गतीने पावले उचलीत त्याचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे. प्रत्येक आघाडीवर आपले सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. त्यामुळेच अद्यापपर्यन्त आपल्या लोकसंख्येच्या मानाने कोरोनाग्रस्तांची सरासरी संख्या कमी आहे. ही साखळी तोडणे आवश्यक आहे. लोक घरात बसली तरच ही साखळी तुटू शकते.पण अतिशहाण्या लोकांना सांगणार कोण ? या विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांमुळेच जे घरात बसून देशासाठी लढत आहेत अशा लोकांना भविष्यात विनाकारण कोरोनाचा त्रास भोगावा लागला तर आश्चर्य वाटू नये. पण गाढवांच्या गळ्यात घंटा बांधणार कोण ? म्हणजेच हे विनाकारण फिरणारे लोक इम्रानखान सारखेच , हम नहीं सुधरेंगे । म्हणणारे .
चंदू धुरी
कार्यकारी संपादक
दै. सत्यवार्ता