
प्रत्येक आईने परीक्षेला जाणार्या मुलांना आवर्जुन वाचायला देण्यात यावे असे पत्र !!
नक्की वाचा आणि पटलं तर आपल्या मुलांना वाचायला द्या.
आईचे पत्र ~ मायेचे छत्र
२५ डिसेंबर २०१९
प्रिय ओम...
मी हे असं तुला पत्र लिहितेय ......अवर्जुन वाच, आणि नक्की विचार कर.....
शाळेची तेरा वर्ष पटकन संपली आणि तू दहावी झालास. प्रथम बालवाडीत जाताना कंटाळणारा तू हळुहळु शाळेत रमलास. खूप सुंदर चित्र काढायचास तू.....कित्येक वर्तमानपत्रात प्रकाशित झाली तुझी चित्रं..... किती मायेने हात फिरवायची मी त्यावर. दरवर्षी तू खेळातही मेडल जिंकत गेलास. घरात मोठ्या अभिमानाने मेडल विराजमान होत गेली. घराचे सौंदर्य तर या मेडलमुळेच वाढले. गणितातही मेडल जिंकून आणलेस. गणिताची तुझी आवड अगदी लहानपणी दिसून आली. टेबल टेनिसही छान खेळू लागलास. धावण्यात चषक जिंकलेस. चित्रकलेच्या परीक्षाही पास झालास. यशाची एक-एक पायरी चढू लागलास.
मग दहावीची परीक्षा आली आणि तू ९३% टक्के मिळवलेस. गणितात तर ९८ /१०० मार्क मिळवलेस.आनंदाने डोळे भरून आले माझे. तुझ्या यशाने माझेही मन प्रसन्न झाले. सार्या कष्टांचे सार्थक झाले असेही जाणवले.
पण हे इतके सोपे का होते....?
तू पहिलीत असतानाच नोकरी सोडून दिली मी. पाळणाघरात किंवा आजीकडे तुझा अभ्यास होत नव्हता. तुला वाचायलाही धड जमत नव्हते. तुझ्या बरोबरची सगळी मुले छान वाचन करत होती. डाॅक्टरकडे जाऊन दाखवावे असेही सुचवले गेले. मग लक्षात आले तू गरगर वेगाने डोकं हलवत असल्यामुळे अक्षरांवर लक्ष केंद्रीत होत नव्हते. तुझे डोकं व केस धरून वाचायला शिकवले आणि वाचनाचा छंदच तुला जडला.....
शाळेत असताना तू खूप दंगा मस्ती करू लागलास. सारखा टी. व्ही पाहण्यात वेळ घालवू लागलास. मग कधी कधी मला कठोर ही होणे भाग पडले. सरळ केबल कनेक्शन काढुन टाकले. मग तू अभ्यासात रमलास. मीही वाचन, लेखनात मन रमवू लागले. गेली चार वर्ष आपण दोघांनीही टी.व्ही पाहिला नाही रे.....
तुझे कष्ट आणि मनाचा त्रास बराच कमी होईल, म्हणून काही गोष्टी सांगत आहे....
वेळ कधीच कुणामुळेच थांबत नाही. त्यामुळे शिक्षणाची ही वर्ष कधीच परत येणार नाहीत. हीच वर्ष पटकन तुझ्या आयुष्यातून निघून जातील. तेव्हा आता कायम लक्षात ठेव की, भरपूर परिश्रम घे. रोज अभ्यास करत रहा. आपण सरस्वती मातेचे उपासक आहोत हे लक्षात असू दे.
आयुष्य एक परीक्षा आहे.. त्यामुळे आज वेळ वाया घालवलास तर उद्या कदाचित तुला संघर्ष करावा लागेल. त्यापेक्षा आज मनापासून, भरभरून अभ्यास कर. आनंदी राहा. मन शांत व प्रसन्न ठेव. मन एकाग्र ठेवणे अत्यंत जरूरी आहे.
यश ही एक हवीहवीशी गोष्ट आहे.. ...तू खूप परिश्रम केलेस तर ते तुझेच आहे. पण समजा तुला यश सोडून गेले तर जरा धीर धर. पुन्हा पुन्हा प्रयत्न करत रहा. सगळ्यात सुखी किंवा दुःखी आपलंच जीवन असे समजू नकोस. अपयश आले म्हणून त्या दु:खालाही जास्त कवटाळून बसू नकोस.
अनेक यशस्वी माणसांनी शिक्षण अर्धवट सोडलं, तरी ते यशस्वी झाले अशा कहाण्या तू वाचल्या असशीलच ! पण याचा अर्थ असा नाही की, एक शिक्षण सोडलं की तूही यशस्वी होशील. शिक्षण हा जीवनातील यशाचा पाया आहे. तुला उत्तम संधी मिळाली आहे. या संधीचे तू सोनं कर.....
उद्या तुझी बारावीची परीक्षा असेल...तुझे मन जराही विचलीत होऊ नये याची दक्षता घे. प्रश्नपत्रिकेवर मन एकाग्र कर. देवाचे नामस्मरण कर. हेच नामस्मरण मन एकाग्र करण्यास मदत करते. जराही घाबरू नकोस. दोन वर्ष तू उत्तम तयारी केली आहेस हे लक्षात ठेव. एकेक प्रश्न लक्षपूर्वक सोडव. काही प्रश्न आले नाहीत तर सरळ सोडून दे. आपले आयुष्य ही असेच आहे........ अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला माहित नसतात. पण पुढे पुढे जाणे हेच योग्य आहे. प्रश्नपत्रिका सोडवून झाली की मग अवघड, न जमणारे प्रश्न सोडवायला घे. परीक्षा ही केवळ आपल्या ज्ञानाची कसोटी नसते . आपल्या धैर्याची, मानसिक क्षमतेचीही कसोटी असते.
घरी आल्यावर संपलेल्या परीक्षेचा विचार करत बसु नकोस. नवीन विषयाची तयारी करायला लाग. निकालाची जराही काळजी करू नकोस. आई—वडिलांचे, गुरूजनांचे व अन्य थोरा मोठ्या माणसांचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत ......
तू स्वत:च्या पायावर उभा राहू शकशील तोर्पयत तुझ्या पाठीशी राहणे ही माझी जबाबदारी. त्यानंतर तुला आयुष्य कसं जगायचं हे तूच ठरवायचे.
शिक्षणाचे सार्थक करून देशाची, सेवाही करायची आहे.
आणखी एक, योग्य मार्गाने पैसा कमवायचा. काटकसरीने पैसा वाचवायचा. श्रीमंत व्हायचं तर मेहनत करावीच लागते. जगात फुकट कधीच काहीच मिळत नाही. सर्व व्यसनांपासुन स्वतःला दूर ठेवायचे.
आपल्या आरोग्याची छान काळजी घेत रहायची. सकस आहाराने शरीर व मनाला सुंदर ठेवायचे. जीवन सकारात्मक ठेवायचे.
बाळा, तुला हे पाठवण्यात आलेले पत्रच तुझ्या आयुष्याची सर्वात सुंदर भेट असेल...
तुझी आई, ✍सौ. सोनाली टोपले...