
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर ३०० वी जयंती वरळी मध्ये उत्सवात साजरी !!
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर ३०० वी जयंती वरळी मध्ये उत्सवात साजरी !!
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर ३०० वी जयंती वरळी मध्ये उत्सवात साजरी – सप्तखंजिरी कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रमांनी रसिक मंत्रमुग्ध...
धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक चेतनेचे तेजस्वी प्रतीक असलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान, धनगर ओबीसी समाज – वरळी, मुंबई प्रेमनगर यांच्या वतीने अत्यंत भक्तिभाव, उत्साह आणि एकात्मतेने साजरी करण्यात आली.
या विशेष प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या सप्त खंजिरी कीर्तन महोत्सव कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते कीर्तनकार सत्यपाल महाराज यांचे शिष्य पवनपाल महाराज वडाळीकर (अकोट, जि. अकोला) यांचे प्रेरणादायी प्रवचन. त्यांनी अहिल्यादेवीच्या धर्मनिष्ठ, दूरदर्शी व न्यायप्रिय राज्यकारभाराची ओघवत्या शैलीत उकल करत उपस्थितांचे मन जिंकले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ओबीसी नेते आणि मा. आमदार प्रकाश (अण्णा) शिवाजी बापू शेंडगे यांनी सामाजिक ऐक्य व प्रेरणादायी नेतृत्वावर भर देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. विशेष अतिथी विभागप्रमुख मा. नगरसेवक आशिष चेंबूरकर आणि जागृती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मनोज परब यांनी आपल्या मनोगतातून अहिल्यादेवींच्या कार्याची महती सांगितली.
कार्यक्रमात खंडेराया हलगी ग्रुप – मानखुर्द (सोनू गेजगे) यांच्या वादनाने वातावरण भारलेले होते, तर स्थानिक महिला मंडळ, धनगर समाजाचे बांधव आणि विविध मान्यवरांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
या कार्यक्रमाविषयी माहिती पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मंगेश अधिका त्रिंबक वाघमोडे यांनी दिली. त्यांनी सांगितले की, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी धर्म, समाज आणि अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी केलेले कार्य आजही समाजासाठी दीपस्तंभ आहे. त्यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन आवश्यक आहे.
अहिल्यादेवींचे थोडक्यात कार्य:
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या १८व्या शतकातील एक आदर्श महिला शासक होत्या. त्यांनी आपल्या शासनकाळात काशी, गंगाघाट, सोमनाथ, अयोध्या, पंढरपूर यांसारख्या धर्मस्थळांचे जीर्णोद्धार केले. जनतेचा न्याय, महिलांचे सक्षमीकरण, जलसंधारण, आणि कृषी सुधारणा यासाठी त्यांनी अविरत कार्य केले. त्या केवळ एक राजश्री नव्हत्या, तर सर्वसामान्य जनतेच्या काळजातील माता होत्या.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून समाजातील बंधुभाव, श्रद्धा आणि इतिहासाची जाणीव यांना उजाळा देण्यात आला.