आपण पॉझिटिव्ह विचार केला तरच कोरोना निगेटिव्ह विचार करेल !!

आपण पॉझिटिव्ह विचार केला तरच कोरोना निगेटिव्ह विचार करेल !!

     महाराष्ट्रात चार दिवसांपूर्वी केंद्रीय आंतर मंत्रालयीन आरोग्य पथक म्हणजे आयएमसी टीने येऊन येथील परिस्थितीतीची पाहणी केली. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ,मुंबई महानगरपालिकेचे व  राज्य शासनाचे अधिकारी त्यांच्या समवेत होते . राज्याने कोविड रुग्णांसाठी काय उपाययोजना केली? याचा सर्व अभ्यास केल्यानंतर या केंद्रीय समितीने अहवाल दिला की ३० एप्रिल पर्यंत राज्यात ४२ हजारच्या वर रुग्ण वाढतील व १५ मे पर्यंत अंदाजे ६.५ लाखाच्यावर रुग्ण संख्या वाढेल. हा अहवाल आल्याबरोबर महाराष्ट्राच्या जनतेच्या पोटात गोळा आला. आपल्या प्रसार माध्यमांनी ही बातमी लोकांसमोर आणली. आणि राज्य सरकारने आता पर्यंत काय केले ? आणि पुढे काय करणार ? असे प्रश्न विचारले जाऊ लागले.

       खरं पाहता महाराष्ट्र सरकार अत्यन्त चांगल्याप्रकारे काम करीत आहे. आजही आपण दुसऱ्या टप्प्यापर्यंत आहोत. ते सरकार युद्ध पातळीवर करत असलेल्या प्रयत्नांमुळेच ! मात्र आता आयएमसीटीने खुलासा केला आहे की मुंबईत कोविड रुग्णाच्या संख्येतील वाढीबाबत केंद्रीय पथकाने कुठलाही अंदाज वर्तवलेला नाही. मग प्रश्न असा निर्माण होतो की ३० एप्रिल पर्यन्त ४२ हजार हून अधिक आणि मे महिन्याच्या मध्यापर्यन्त ६.५ लाखाच्या वर कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढेल हे कुणी सांगितले, आणि आमच्या प्रसार माध्यमांनी जी बातमी दिली ती कुठल्या आधारावर ? 

        केंद्र सरकारचा आयएमसीटी सारखा जबाबदार आरोग्य विभाग असे बेजबाबदार विधान कसे काय करू शकते ?  आधीच घाबरलेल्या लोकांच्या मनात अशी विधाने मानसिक संतुलन बिघडविण्यास कारणीभूत ठरतात. त्यानंतर आयएमसीटी खुलासा करते की असा कुठलाही अंदाज केंद्रीय पथकाने वर्तवलेला नाही. म्हणजे आम्ही सामान्य लोकांनी यांच्यावर तरी काय भरवसा ठेवायचा ? केंद्रीय पथकाने जे गणित मांडले ते काल्पनिक गणिताच्या मॉडेलवर आधारित होते, म्हणजे ३.८ दिवसाच्या दुपटीने वाढीच्या दराने ते मोजले होते असे म्हणतात. पण असे अंदाज वर्तवून सर्वसामान्य जनतेच्या भावनेशी का खेळायचे?

      आज या कठीण परिस्थितीत राज्य सरकार सकारात्मक विचार करीत आहे. अनेक डॉक्टर, नर्सेस, हॉस्पिटलमधील  कर्मचारी, पोलीस, सर्व महानगरपालिका कर्मचारी, वीज मंडळ कर्मचारी, पाणी पुरवठा कर्मचारी, पत्रकार, कॅमेरामन आपली जिवाची बाजी लावून काम करत आहेत. अशात काहितरी आशादायक दिसत आहे ते म्हणजे  रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण वाढते आहे. वरळी सारख्या हॉटस्पॉट विभागात रुग्णांमध्ये सुधारणा होऊन घरी जात आहेत. ही उत्साहवर्धक बाब आहे. कोरोनाला हरवण्यासाठी आता खरी गरज आहे ती सकारात्मक  विचार करण्याची,अफवांवर विश्वास न ठेवण्याची,  पॉझिटिव्ह चिंतन करण्याची. आपण पॉझिटिव्ह विचार केला तरच हा कोरोना निगेटिव्ह विचार करेल  आणि हतबल होऊन निघून जाईल. 


चंदू धुरी 

कार्यकारी संपादक

दै. सत्यवार्ता


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week