कातर वेळ !!

    संध्याकाळच्या गडद छाया अंगणात उतरू लागल्या आहेत. त्याच सावट मनावर पसरलयं. छाया प्रकाशाचा  खेळ सुरू झालायं. दुरवर कुठेतरी धूसर अस तुझ अस्तित्व जाणवतं.... 

              निव्वळ भासच तो !

     माझ्यापासून खूप दूर आहेस तू ! पण आठवणींच्या रूपाने मात्र तू माझ्या जवळच आहेस. अगदी मनाच्या गाभाऱ्यात ! गाभूळलेल्या चिंचेची आंबट गोड चव जशी जिभेवर रेंगाळते ना ! तशीच आपल्या प्रेमाची आठवण. गाठीभेटी, भेटीत तुझी ती मला जपणारी तऱ्हा प्रेमाचे रंग मनात उधळतात. गाठी भेटीतले मंतरलेले क्षण यांची आठवण ही रेंगाळते ! मन व्याकुळतयं. ही कातर वेळच तशी !  माणसाचं मनही कातर होऊन जातं !

       मनाला कसलतरी अनामिक भय, दाटून आलेला गळा ! का होत असाव असं ?निसर्गाचं हे रूप कसली जाणीव करून देत असते ?  झाकोळून का येत मन ? असंख्य प्रश्न ज्यांची उत्तरे माणसाच्या आकलना पलीकडची अनाकलनीय !

   अशाच एका कातर वेळी आपण एकमेकांचा निरोप घेतला होता. या आभाळाच्या साक्षीनं आपण एकमेकांचे झालो होतो. पुन्हा भेटण्याच्या आणाभाका झाल्या होत्या. यांच्या साक्षीने तू मला वचन दिलं होतंस. एक तप उलटून गेलयं. विसरलास का रे ? 

               तू दिलेल वचन ! 

        लांबवर अंधुक होत जाणारी तुझी सावली निरखत मी डबडबत्या डोळ्यांनी पहात उभी होते. एका वळणावर तू हात उंचावून दिलेला निरोप, माझ्यासाठी थांब ! वाट बघ ! असं सांगणारा तो हात होता. मीही त्याला प्रतिसाद दिला होता. की तुझा इशारा वेगळाच होता ? अखेरच्या निरोपाचा ! पण तसं नसावच ! मग तू का परतला नाहीस मला घेण्यासाठी ? का अल्लड वेड प्रेम वाटलं होतं तुला ? पण त्या वयातलं प्रेमही खर असू शकत !

        सागरच्या लाटांसारखं उचंबळून येणार ! धरतीकडे असोशीने धाव घेणाऱ्या लाटांसारखं तसंच होतं ना आपलं प्रेम ? तुझी प्रतीक्षा करीत मी त्या आभाळाखाली उभी राहते. की मीच वेडी आहे ? तुझा इशारा प्रतीक्षेचा होता, की निरोपाचा ? ते मला त्यावेळी उमगलंच नाही. माझ्या डोळ्यातले भाव त्यावेळी तुला समजलेच नाहीत. का ते वाचण्याच्या प्रयत्नच तू केला नाहीस !           काळ सरकतोयं त्याला मागे नाही परतवू शकत आपण ! पण, फडफडणारी काळाची पानं उलटून बघण्याची ही माणसाला एक अनामिक ओढ असते. कडू, गोड आठवणीतही आनंद असतो. या स्मृति कशाही असल्या तरी मधुर वाटतात. स्वतःच्या, मनाच्या गाभाऱ्यात जरा डोकावून बघितलंस ना तू, तर तुलाही जाणवेल हे! अशाच आठवांचे झोके घेत तर जगत असतो आपण. सारच उराशी बाळगत एखाद्या क्षणी मग अशी जीवघेणी कळ येते हृदयातून ! अवघ भावविश्व उध्वस्त करत, अंतबाह्य हलवून टाकते ! तरीही मी तुझी वाट पाहणार आहे. माझ्या प्रेमावर विश्वास ठेवून कदाचित आतापर्यंत!!!!! 

             प्रीती


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week