
मराठी वाचवा !!
मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास मराठी भाषेचा विकास वेगाने होण्यास मदत होईल. राजकीय पक्षांनी, मग ते कोणत्याही विचारधारेचे असोत, त्यांनी हा अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अर्थात अभिजात दर्जा हे भाषेच्या अधिक विकासाचे एक माध्यम आहे साध्य नव्हे. या माध्यमातूनच पुढे मराठी भाषेचा ज्ञान भाषेत विकास करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत.
मराठी भाषिकांचा खराखुरा विकास तेव्हाच होऊ शकेल जेव्हा ती ज्ञानभाषा होईल. दुर्दैवाने त्या दृष्टीने कोणत्याच पातळीवर प्रयत्न होताना दिसत नाही. राजकीय पक्षांना तितक्या खोलात शिरण्याची गरज भासत नाही. त्यांचे राजकारण हे आपली मतपेटी सुरक्षित ठेवण्यापर्यंतच मर्यादित असते. न्यायालयीन कामकाज, न्याय निवाडे मराठी भाषेत झाले पाहिजेत. कायद्यांचा अनुवाद इंग्रजीतून मराठीत होणे गरजेचे आहे. परंतु ते काम गेल्या ४० वर्षांपासून अद्यापही प्राथमिक अवस्थेत आहे. यावरून मराठी भाषेचे ज्ञान भाषेत रूपांतर करण्याचे प्रयत्न किती क्षीण आहेत हे लक्षात येईल. या वेगाने आपण आपले ध्येय कधी गाठू शकणार?