
हाथरससारख्या अमानुष घटना थांबणार तरी कधी ?
दिल्लीतील भयंकर निर्भया प्रकरणाची थरारक आठवण करून देणाऱ्या उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका शेतात राबणाऱ्या दलित युवतीवरील पाशवी अत्याचारांच्या घटनेने देश पुन्हा एकदा ढवळून निघाला आहे. निर्भया बलात्कार प्रकरणानंतर निर्माण झालेल्या लोकक्षोभाने तत्कालीन केंद्रीय सरकार उलथवून टाकले. अशा भीषण प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून बलात्कार करून पीडितेची नृशंस हत्या करणाऱ्यास मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली. परंतु त्यातून काहीच साध्य झाले नाही. उलट स्त्रियांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांमध्ये वाढच झाली. निर्भया ते हाथरस या घटनांदरम्यान बलरामपूर, बाराबंकी,कोपर्डी अशा अनेक अमानुष घटनांची भयावह मालिकाच तयार झाली आहे. अशा प्रत्येक घटनेनंतर देश काही काळापुरता हादरून जातो आणि पुन्हा थंड होतो. हे असे का घडत आहे? गुन्हेगारांना कायद्याची भीती का वाटत नाही? याचा मूलभूत विचार करताना कुणीच दिसत नाही. अशा हिडिस घटनांची कारणे शोधू गेल्यास ती सदोष समाज रचनेची निपज असल्याचे लक्षात येते. समाज आदिशक्ती दुर्गा, अंबा, महाकाली वगैरे परमशक्तीमान देवतांच्या रूपात स्त्रीची पूजा बांधतो असा समज करून घेणे भ्रम आहे. ज्या शक्तीमान स्रियांची पूजा बांधली जाते त्या स्त्रिया स्वर्गस्थ देवता असतात अशी समाजाची मानसिक धारणा असते. त्यांचा मर्त्य जगातील सामान्य स्रियांशी त्यांनी काडी इतकाही संबंध ठेवलेला नसतो. पुरुष स्त्रीला केवळ आपली उपभोग्य वस्तू मानून तिचा उपभोग घेत असतो. स्त्रीने पुरुषाच्या किंवा समाजाच्या संकल्पनेतील स्त्रीच्या मर्यादांचे उल्लंघन केल्यास तो तिला क्षुद्र वस्तू मानून चुरगाळून दूर भिरकावून देतो किंवा अन्य क्रुर हिंसक मार्गाने तिची विल्हेवाट लावतो.
समाजात पौरुषत्व किंवा मर्दपणाविषयी अनेक प्रखर ज्वलंत परंतु चुकीच्या संकल्पना रुजलेल्या आहेत. त्यामुळेच त्या संकल्पनांना तडा जाताच ते आपल्या पौरुषत्वास मिळालेले आव्हान आहे असे समजून ते मोडून काढण्यासाठी पुरुष स्त्रियांवर अत्याचार करीत असतो, मग ती स्त्री प्रत्यक्ष त्याची आई, मुलगी, बहीण, मैत्रिण, बायको किंवा अन्य कुणीही असो. या बदलांसाठी समाजाची मानसिक तयारी आणि ते बदल अमलात आणण्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे. यासाठी समाजात जागृती करणाऱ्या चर्चा घडवून आणण्याची गरज आहे. उच्च-नीच हे जातीभेद समूळ नष्ट करणे, मुलगा हाच घराण्याचा कुलदीपक असतो ही धार्मिक संकल्पना मोडीत काढणे, कौटुंबिक सत्ताकेंद्र बदलून ते घरातील कर्त्या स्त्रीकडे सोपविणे, स्त्री- पुरुष समानतेच्या घटनादत्त कायद्याचा आदर करणे, स्त्रीविषयी आदराची भावना निर्माण होईल असे वातावरण घरात निर्माण करणे, पौरुषत्वाची भावना नैसर्गिक असते, तिचा योग्यरित्या वापर केल्यास जीवन अधिक सुखी समाधानी बनते हे पटवून देणे, इत्यादी अनेक गोष्टी घडल्या तरच या हाथरससारख्या पशूतुल्य घटनांमध्ये घट होऊ शकेल..