
प्रदूषणाच्या विरोधात जनतेने आता तरी जागे व्हावे !
जनजागृतीसाठी वातावरण फौंडेशन या संस्थेने खारघर नवी मुंबई येथे बसविलेली कृत्रिम फुफ्फुसे केवळ दहा दिवसांत काळी पडली हे वृत्त नवी मुंबईकरांसाठी धक्कादायक आहे. तेथील वातावरणाने प्रदूषणाची धोक्याची पातळी ओलांडली असून ही बाब जनतेच्या आरोग्यास घातक असून स्थानिक प्रशासनाने या संदर्भात त्वरित योग्य ती कारवाई करण्याची गरज आहे. परंतु लक्षात कोण घेतो! वातावरण या संस्थेने या आधी मुंबईत वांद्रेपासून दिल्ली पर्यंत सर्वत्र असे प्रयोग करून जनजागृती करण्याचे प्रयोग केले आहेत. परंतु रोजी रोटीसाठी धापा टाकीत धावणाऱ्या सामान्य माणसास याबाबींकडे लक्ष देण्यास फुरसत नाही.
स्विझरलँडच्या एखाद्या ग्रेटा थनबर्ग सारखी प्रदूषणाच्या विरोधात स्थानिक नेत्यांपासून बलदंड जागतिक नेत्यां विरुद्ध बंड पुकारणारी षोडषा सामाजिक व राजकीय वातावरण पोषक नसल्यामुळे आपल्या देशात निर्माण होऊ शकत नाही. विकासाच्या समप्रमाणात प्रदूषण वाढत जाते. आपल्या देशाचा अधिक विकास होणे आवश्यक आहे. परंतु त्याचबरोबर प्रदूषणाची पातळी कमी राखण्याची जबाबदारीही आपलीच आहे. त्यासाठी सौरऊर्जा आणि अणूऊर्जा सारखे कमी प्रदूषण करणारे प्रकल्प अधिक प्रमाणात राबविण्याची गरज आहे. परंतु आपल्या राजकीय लाभासाठी किंवा स्वार्थी हेतूने किंवा अज्ञानापोटी अशा प्रकल्पांना आपल्या देशात विरोध होतो. जैतापूरचा अणूऊर्जा प्रकल्प असाच रखडविण्यात आला आहे. स्थानिक शासकीय यंत्रणा, तसेच सामान्य जनतेनेही जागरूक राहून आपल्यापरीने उपाययोजना करून कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनावर नियंत्रण ठेवले पाहिजे. तरच भविष्यात आपला निभाव लागू शकेल. नाहीतर प्रदूषणामुळे आधीच ऋतूचक्र बिघडलेल्या निसर्गाने अधिक रौद्र रूप धारण केल्यास आपली खैर नाही हे लक्षात घ्यावे.