एकटेपणा !!

         एकटेपणा म्हणजे जीवनात निर्माण झालेली एक पोकळी. मनाच्या गाभाऱ्यात आलेलं एकाकीपण जे व्यक्त झाल्याशिवाय संपल जात नाही.

       एखादी जवळची व्यक्ती गेल्याने, आपल्या मनासारखी आणि तितकीच महत्वाची कोणती गोष्ट न घडल्याने किंवा काही तितक्याच संवेदनशील घटना घडल्या असता मनुष्याच्या जीवनात एकटेपणा निर्माण होतो.

       हा एकटेपणा व्यक्तीसापेक्ष बदलू शकतो पण याचे परिणाम जितके चांगले तितकेच ते वाईट ही आहेतच. काही मोजक्याच व्यक्तींनी यावरून साधारण वाटणाऱ्या परंतु हिमनगाचे स्वरूप असणाऱ्या एकाकीपणावर मात केली नव्हे नव्हे तर यालाच त्यांनी दुसरी संधी मानून त्याचे रूपांतर आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर यशात परावर्तित केले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कुळवाडी भूषण श्री छत्रपती शिवाजी महाराज होय. मिर्झाराजे जयसिंग सोबत झालेला तह, औरंगजेबाच्या दरबारात झालेला अपमान, पन्हागडावर पडलेला वेढा असो की आपल्याच बांधवांनी केलेली गद्दारी असो की आई जिजाऊंचा देहांत असो. त्यावेळी महाराजांना एकाकीपण आलेच असेल ना पण महाराजांनी त्यातून आपल्या इच्छाशक्तीना सोबत घेऊन मार्ग काढलाच ना. मग आपण का हताश होऊन बसायचे? हातपाय गाळून का खचायचे?

       अशा अप्राप्य परिस्थितीत स्वतःला कोंडून घेण्यापेक्षा मन मोकळे करा. राजांना तर अशी काही सोयच नसेल ना. कारण एक राजाच जर असा खचून जाणार असेल तर इतरांचे काय ? त्यांनी स्वतः मार्ग शोधलाच ना. आपल्याला तर सध्या किती जमेच्या बाजू आहेत. किती सोयी आहेत.

  आता मुळात एकाकीपण का येते ? काही कारणे पाहू.


१) आपल्या खूप जवळची व्यक्ती जीवनातून कायमची निघून जाणे.

२) परिक्षांमधील आलेले अपयश.

३) प्रेमभंग होणे.

४) व्यवसायात आलेले अपयश.

५) मनात नैराश्य येणे.

६) आर्थिक चणचण.

७) वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्या.

८) अपेक्षाभंग.

         अशी बरीच कारणे आपल्याला सांगता येतील की ज्यामुळे नैराश्य येते.

        माणूस आतून खचून जातो.

  आपण का जगतो आहोत ? कोणासाठी जगत आहोत ? आता काय राहिले आहे माझं ? मी काय करू आता ?  अशा प्रश्नांनी मन पोखरून निघत. मन सगळ्या गोष्टींवरून उडून जात. मनुष्याची सदसदविवेकबुद्धी विसरून एकाकीपणात गुर्फुटून जातो.

      मुख्य म्हणजे माणूस अशा गोष्टी जवळच्या माणसाला ही कळू देत नाही. का ? तर आपला इगो. मी कशाला सांगू माझे दुःख कोणाला ? लोक हसतील मला. याच भूमिकेतून तो वावरतो.

       पण याच एकाकीपणाला हरवायचे असेल तर मन हलकं करण्यासारखा सगळ्यात सोपा पर्याय नाही मित्रांनो. तुम्ही जेवढं तुमचं मन हलकं कराल तेवढं तुम्हाला समाधान मिळत जाईल. म्हणून व्यक्त व्हायला शिका.

  आता व्यक्त कुठे व्हायचं आणि कसे हे आपण खाली पाहू.

१) व्यक्त व्हायचे म्हणजे सोप्या भाषेत आपले मन हलकं करायचं. जे काही बोलायचं असेल ते बोलायचं. पण कुठे ? जिथे आपले शब्द ऐकले जातील तिथे. मग ते कोणीही असो.

२) नकारार्थी स्वभावाच्या माणसात जास्त वेळ घालवायचा नाही.

३) टीव्ही पाहणे (सर्व मिळून), सांघिक खेळ खेळणे.

४) आपल्यावर आलेल्या संकटांची (आर्थिक असो वा शारीरिक) जाणीव आपल्या जवळच्या व्यक्तींना वेळेत देणे.

५) वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी जोडीदाराला विश्वासात घेऊन सोडविणे.

६) मित्रांशी चर्चा करणे.

७) आपले कोणी ऐकावे असे वाटत असेल तर आपण ही ती भूमिका चांगल्या प्रकारे निभावणे ई.

८) सकारात्मक वातावरण असेल अशा ठिकाणी जास्त वेळ व्यतीत करणे.

९) पुस्तके वाचन.

   शेवटी काय तर एकाकीपणा हा काही कायम राहणारा नसतो त्याला वेळेत लगाम घातला तर जीवनातील गोडी अजुन वाढायला मदतच होईल.

       (भुषण कौशल्या लक्ष्मण मडके)

          व्हॉट्सअप ८२०८२१४१७९


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week