
बहू चर्चित खोलसापाडा धरणाच्या कामाला वन खात्या कडून हिरवा कंदील !!
बहू चर्चित खोलसापाडा धरणाच्या कामाला वन खात्या कडून हिरवा कंदील !!
बहुचर्चित खोलसापाडा धरण २ च्या कामातील सर्व अडथळे दूर झाले असून वनखात्या कडून या कामाला मंजुरी मिळाली आहे. येणाऱ्या दिवाळीत खोलसापाडा धरणाचे भूमी पूजन केले जाणार आहे. खोलसापाडा धरण टप्पा २ मधून वसई-विरार शहराला दररोज १५ दशलक्ष लिटर पाणी मिळू शकणार आहे.
सध्या वसई- विरार शहराला सूर्या, धामणी धरणातून दशलक्ष लिटर सोबत सूर्या टप्पा ३ मधून १०० दशलक्ष लिटर्स, उसगाव धरणातून २० आणि पेल्हार धरणातून १० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. वाढती लोकसंख्या आणि अन्य तांत्रिक कारणामुळे पाण्याची गळती होत असल्याने पाण्याची तुटही मोठी आहे.
त्यामुळे शहराच्या अनेक भागात पाणी मिळत नाही. वसई विरार मधील वाढती लोकसंख्या आणि पाण्याची मागणी लक्षात घेता पालिकेने खोलसापाडयाची दोन्ही धरण विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या टप्प्यात खोलसापाडा २ हे धरण विकसित केले जाणार आहे. हे धरण लघु पाटबंधारे खात्याच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे लघुपाट बंधारे खात्या मार्फत ही पाणी पुरवठा योजना राबवली जाणार आहे. या कामाचा एकूण खर्च ५२ कोटी रुपये एवढा आहे. पालिकेने या कामाला सप्टेंबर २०१८ मध्ये मंजुरी दिली होती. खोलसापाडा २ धरणाच्या कामाला अनेक अडथळे निर्माण झाले होते.
त्यात मुख्य अडसर हा वनखत्याचा होता. खोलसा धरणाच्या धरणाचे पाणलोट क्षेत्र वन खात्याच्या जागेत आहे. त्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देणे आणि ६ लाखाचे झाडांचे वनीकरण करण्याची अट होती. यासाठी वन खात्याला १२ कोटी रुपयांचा मोबदला दयायचा होता. या शिवाय अनेक तांत्रिक अडचणी होत्या. वसई चे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या प्रकरणी पाठपुरावा केला होता. त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आणि वनखात्याला १२ कोटी रुपये सुपूर्द करण्यात आले. या शिवाय मार्गावर ६ हजार ८७५ झाडे कापण्यासाठी ९ लाख ३२ हजार रुपये ही देण्यात आले.
यामुळे खोलसापाडा-२ धरणाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहे. वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाख झाली आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या प्रस्तवित आराखड्यात पुढील २० वर्षात शहरातील लोकसंख्या ४५ लाख एवढी होणार असण्याची शक्यता आहे.