
पारपत्र कार्यालय आता पालघर मध्ये !!
वसईत गेल्या अनेक वर्षां पासून वसईकरांची मागणी असलेले पारपत्र (पासपोर्ट) कार्यालय अखेर मंजूर झाले आहे. मात्र या कार्यालयासाठी वसई विरार मध्ये जागाच मिळत नसल्याने ते अद्याप सुरू झालेले नाही. वसई-विरार मध्ये जागा न मिळाल्यास पारपत्र कार्यालय पालघरला करण्यात येणार आहे. हे कार्यालय पालघरला गेल्यास वसईकरांच्या गैर सोयीत मोठी भर पडणार आहे. वसई-विरार ची लोकसंख्या २५ लाखाहुन अधिक आहे.
शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात परदेशात शिक्षणासाठी, नोकरी साठी पर्यटनासाठी जात असतात, परदेशात जाण्यासाठी पारपत्राची आवश्यकता असते. पण वसई विरार शहरात पारपत्र कार्यालय नाही. त्यामुळे वसई-विरार मधील नागरिकांना मुंबई अथवा ठाणे येथील पारपत्र कार्यालयात जावे लागते.
ही कार्यालये वसई पासून दूर असल्याने या कार्यालयात जाण्यासाठी नागरीकांचा वेळ वाया जात असुन प्रवास खर्च मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हा त्रास कमी होण्यासाठी शहरात स्वतंत्र पारपत्र कार्यालय सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षा पासून करण्यात येत होती. या मागणी नुसार केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. केंद्र शासनाच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंजूर केले आहे, परंतु पत्रालय सुरू करण्यासाठी जागाच नसल्याने पारपत्र कार्यालय सुरू झाले नाही. पारपत्र कार्यालयाला जागा मिळत नसल्याने पारपत्र कार्यलय पालघर येथे नेण्याची शक्यता आहे. या बाबत पालघर जिल्यातील खासदार राजेंद्र गावित यानी सांगितले की पारपत्र कार्यालयासाठी आम्ही पाठ पुरावा केला होता म्हणून ते मंजूर झाले परंतु आता नगरपालिकेने अथवा जिल्हाधिकाऱ्यांनी जागा देणं गरजेचं आहे.
जर वसई विरार मध्ये जागा मिळाली नाही तर पारपत्र कार्यालय आम्हाला नाईलाजाने पालघर येथे न्यावे लागेल. वसई विरार शहरातील शासकीय जागा ह्या (एन डी) झोन मध्ये आहेत. पारपत्र कार्यालय पालघर ला नेले तर गैर सोईचे ठरेल, त्या पेक्षा मुंबई सोईस्कर आहे ! अश्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. अनधिकृत बांधकामासाठी जागा मिळते परंतु नागरिकांसाठी महत्वाचे असलेल्या पारपत्र कार्यालयासाठी जागा मिळत नाही ही दुर्दैवी बाब आहे.
डोंबिवलीत टपाल कार्यालयात पारपत्र कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्या धर्तीवर वसईतील टपाल कार्यालयात पारपत्र कार्यालय सुरू करता येईल असे वसईतील समाज सेवक जॉय फरगोस यांनी सांगितले.