
लोक प्रतिनिधींची मुदत संपल्यामुळे नायगाव येथील शौचालयाची दुरावस्था !!
लोक प्रतिनिधींची मुदत संपल्यामुळे नायगाव येथील शौचालयाची दुरावस्था !!
मच्छिमार बांधवांचे आगर म्हणजे वसई तालुक्यातील नायगाव, याच नायगाव कोळीवाड्यात महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या सार्वजनिक महिला शौचालयाची मागील दिड वर्षात अत्यंत दुरावस्था झाली आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे महानगर पालिकेवर प्रशासक राज आणि त्यात २८ जुन पासुन लोकप्रतिनिधींची मुदतच संपल्या मुळे ह्या शौचालयाच्या देखभाल दुरुस्तीकडे वसई विरार महानगर पालिकेने पूर्ण दुर्लक्ष केले आहे. हे उघड झाले आहे. त्यामुळे ह्या भागातील महिलांना शौचास जाण्यास असंख्य अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.
नायगाव पश्चिम भागात नायगाव कोळीवाडा परिसर आहे. ह्या भागात ग्रामपंचायत काळा पासून महिलांना उघड्यावर शौचास बसण्याची वेळ येऊ नये यासाठी इथे सार्वजनिक महिला शौचालय बांधले होते. परंतु सध्या हा भाग महानगरपालिकेच्या हद्दीत मोडत असला तरी मात्र पालिकेने या शौचालयाच्या व आजूबाजूच्या परिसराकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले आहे. पावसाळ्यात तर अत्यंत दुरावस्था होते. पक्की सडक नसल्याने चिखलातून, उंच वाढलेल्या गवताच्या पाय वाटेवरून महिलांना जावे लागते. शौचालयाची दुरुस्ती न झाल्यामुळे अक्षरशः मोडकळीस आलेली आहेत. त्यावर झाडे झुडपे ही आहेत. काही शौचालयाचे दरवाजे तुटलेल्या फुटलेल्या अवस्थेत आहेत. रस्त्यावर दिवे नसल्याने रात्रीच्या सुमारास अंधार असल्याने रात्रीच्या सुमारास महिलांना शौचास जाण्यास अत्यंत अडचणी निर्माण होत आहेत. पायवाटेवर गवत वाढल्यामुळे कधीं सर्प दंश होऊन काही दुर्घटना घडण्याची भीती ही व्यक्त केली जात आहे.
तसेच या शौचालया समोर आडोश्यासाठी बांधलेली भिंत बऱ्यापैकी तुटून पडली आहे. या विविध प्रकारा मुळे येथील शेकडो महिलांची शौचाची मोठी गैरसोय होऊ लागली आहे.