
महाराष्ट्र पोलीस अधिनियमाद्वारे पोलीस उपयुक्तांचे मनाई आदेश लागू !
महाराष्ट्र पोलीस अधिनियमाद्वारे पोलीस उपयुक्तांचे मनाई आदेश लागू !
मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस ठाणे कार्य क्षेत्रामध्ये शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांचे जीव व वित्त सुरक्षित राहण्यासाठी तसेच समाज कंटक व गुंड प्रवृत्तीचे इसम यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करणे सोयीचे व्हावे या करिता मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त श्री. विजयकांत सागर, मीरा भाईंदर वसई विरार यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ चे पोट कलम अन्वये मनाई आदेश लागू करून खालील गोष्टीना प्रतिबंध केला आहे.
१. शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, बंदुका, लाठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही गोष्ट बाळगणे.
२. दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जमा करणे.
३. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे.
४. व्यक्तीच्या किंवा प्रेताकृती प्रतिमेचे प्रदर्शन करणे.
५. सार्वजनिक रितीने घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे.
६. सभ्यता, निती या विरुद्ध असतील अशी किंवा राज्यातील शांतता धोक्यात आणतील, किंवा ज्यामुळे राज्य शासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक प्रदर्शित करणे.
७. पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा प्रति घोषणा देणे, इत्यादी कृत्यांना (गोष्टीला) मनाई करण्यात आली आहे.
ब सदर मनाई आदेश खालील व्यक्तींना लागू राहणार नाहीत.
"जो कोणी इसम सरकारी नोकर आहे, किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्र घेणे भाग पडेल किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याने सूट दिली आहे."
त्याच प्रमाणे सदर आदेश खालील मिरवणुका व जमावास लागू असणार नाहीत.
१. लग्न कार्यासाठी जमलेले लोक
२. प्रेतयात्रा, व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका.
३. सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था, या ठिकाणी जमलेला समुदाय.
४. पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या, पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/ मिरवणुका.
५. सर्व शासकीय /निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडत असलेली ठिकाण.
वरील मनाई आदेश हा मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्य क्षेत्राकरीता दिनांक १६ डिसेंबर २०२१ रोजी १ वाजेपासून ते दिनांक २८ डिसेंबर २०२१ रोजी १२ वाजे पर्यंत अंमलात राहील. सदर मनाई आदेशाचा भंग करणाऱ्यां विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल असे मुख्यालयाकडुन पत्रकाद्वारे नागरिकांसाठी कळविण्यात आले.