शिशिरातील पहाट !!
नेहमी सारखाच पहाटे गजर होतो पण डोळे उघडायला लगेच तयार होत नाही. थंडगार हवा आणि रजईची ऊब यांचा खूप मोह होतो पण मी उठतेच कारण मगच मला प्रभात फेरी करताना पहाटेचे वेगवेगळे सुंदर संभ्रम पहायला,अनुभवायला मिळतात. आणि मला ते खूप आवडत.आणि व्यायाम पण होतो. मी पटापट आवरून बाहेर पडते. निळसर,करड्या रंगाचे एक रंगी आकाश, कलेकलेने कमी होत जाणारा चंद्र, किंचित गुलाबी क्षितिज कडा, झोपेत हुंकार दिल्यासारखी ऐकू येणारी किलबिल, बाहेर अजून कोवळा उजेड असतो. झुंजमुंजू म्हणजे हीच वेळ हे कळत. निरव शांततेत आपण आपल्याच मनाशी केलेला संवाद खूप ऊर्जा देऊन जातो. हळूहळू रस्त्यांना जाग येऊ लागते तेच चिरपरिचित फिरण्यासाठी बाहेर पडलेले चेहरे,शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ, तुरळक गाड्या, दारात चालू असलेली सडा रांगोळी,अचानक ऐकू येणारी भूपाळी, एखादी शेकोटी ,पेपर दूध वाले एकूणच दिवसाच्या वेगाची ती सुरुवात असते.
ठराविक अंतर चालून मी परत फिरते.आता माझ्या आवडीच्या दगडी सुंदर गणपती मंदिरात जाते. फुलांनी सजलेली सुबक गणेश मूर्ती, तेवणारे लामणदिवे,उदबत्तीचा मंद दरवळ हे सगळे बघताच हात आपोआपच जोडले जातात. देवळाच्या आवारात दोन जास्वंदीची आणि एक अशोकाच झाड आहे. आता भक्त येण्यास सुरुवात होऊ लागते. मला सगळ्यात तिथल्या गोष्टीची अपूर्वाई म्हणजे भरपूर चिमण्या. त्या सहज येउन देवा समोरील तांदूळ खातात. आपल्या आसपास छान वावरतात. त्या निर्मळ शांततेतला चिवचिवाट खूपच गोड वाटतो. मी प्रदक्षिणा घालून दगडी खांबाला टेकून एकदा अथर्वशीर्ष म्हणते. तो आनंद, ते पावित्र्य मन शांत करते. देवालय पूर्वाभिमुख आहे. बाहेर येईपर्यंत समोर सूर्याचा तेजस्वी केशर गोल वर येत असताना दिसतो.सगळीकडे केशर रंगांची उधळण सुरू असते. काही किरणे देवळाच्या उंबऱ्याला स्पर्श करण्यासाठी आलेली असतात.
परतीच्या वाटेवर आता खूप बदल होत असतो.दारा दारात छान रांगोळी सजलेली असते, रहदारी वाढलेली असते, वाटेतल्या देवळातील घंटा वाजत असतात सगळीकडे स्वच्छ प्रकाश असतो. या आनंदी प्रभात फेरीचा आनंद घेऊनच घरी येते. हे गच्चीवर झाडांना पाणी घालत असतात. अगदी ठराविक कुंड्या आणि थोडी झाडे ठेवली आहेत. मी चहा घेऊन गच्चीत जाते, अळूच्या पानावर पाण्याचे थेंब मोत्या सारखे दिसतात. तुळस थंडीमुळे थोडी सुकली असे वाटते, ओवा तसाच हिरवागार दिसतो, रात राणीला छोटा तुरा आलेला असतो ,कोरफड आहे तशीच दिसते, मोगरा वसंताच्या प्रतिक्षेत असतो पण देशी गुलाबी गुलाब मात्र छान बहरलेला दिसतो. त्याची उमललेली फुले रंग गंधाची उधळण करतात. आता सूर्यबिंब सहस्त्र किरणांनी तळपत असते. आता त्याचा केशरी रंग जाऊन सोन पिवळा झालेला असतो .क्षितिज कडा आणि आभाळ किती वेगवेगळे रंग बदलत असते ते शब्दात व्यक्त करणे अवघडच त्या अनामिक चित्रकाराचे कौतुक करावे तितके कमीच.
आमच्या आसपासची झाडे आता किरणांत न्हाऊ लागतात. आमच्या अगदी समोर आंब्याचे झाड आहे त्याची थंडीमुळे थोडे पाने पिवळी पडली आहेत पण वसंतात हेच झाड आणि त्याचा मोहर खूप खुलून दिसतो आणि त्या वेळी कोकिळेच्या आवाजाने आसमंत निनादत राहतो.
एंटीना,तारा, झाडावर सगळीकडे गारव्यामुळे एकमेकांना चिकटून उन्हाची किरणे अंगावर घेणारे काही पक्षी खूपच विलोभनीय दिसतात.अलीकडे वेडे राघू खूपच वाढलेत त्यांचा पोपटी रंग आणि किंचित गुलाबी छटा असलेले पंख उडताना बघणे मस्त वाटते. बुलबुल, चिमणी, कावळे, कबुतर हे तर आहेतच पण जांभळ्या रंगाचा शिंजर,साळुंक्या, क्वचितच दिसणारा विटकरी पंख असलेला भारद्वाज, अगदी छोटी काळी चिमणी, सुतार पक्षी, माझा खूप आवडता निळ्या पंखांचा लांब चोचीचा खंड्या,या सगळ्यात मोठी असणारी आणि नारळाच्या झाडावरच बसणारी घार असे कितीतरी पक्षी इकडे तिकडे बागडतात. मधेच कधीतरी पिवळे पंख असलेले पक्षी आंब्याच्या झाडावर अगदी थोडा वेळ थांबले होते, उन्हात त्यांचे पंख सोन्यासारखे चमकत होते. बहुतेक ते हळद्या होते ,पण परत ते दिसले नाहीत. अजूनही या ऋतूत स्थलांतरित पक्षी खूपच येतात पण त्या सगळ्यांची नावे माहित नाहीत. पण प्रत्येकाचे सुरेख दिसणे आणि तितकीच मधुर बोली या मुळे सगळे वातावरण भारले जाते हे नक्की.
मागे कन्या शाळा आहे. तिथला गुलमोहर कायम फुललेला असतो. आता पक्ष्यांच्या चिवचिवाटा बरोबर शाळेतील प्रार्थनेचे सूर मिसळतात. आणि हा सूर, ताल, रंग, गंध आणखीनच देखणा होत जातो. ही सगळी पहाट प्रसन्नता माझ्या तना मनात भरून राहते आणि मी आनंदाने येणार्या दिवसाला सामोरी जाते.
सौ. माधुरी म. इनामदार
मिरज