राज - उद्धव ची फक्त चर्चाच...

राज - उद्धव ची फक्त चर्चाच...

         राज आणि उद्धव ठाकरे एकत्रित येणार अशी चर्चा सध्या महाराष्ट्रात जोर धरू लागली आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर सुरु झालेल्या या चर्चेला अधून मधून फोडणी घातली जातच होती. भाजपाने प्रथम राज यांना आणि नंतर उद्धव यांना धक्का दिल्यानंतर राज आणि उद्धव एकत्रित येण्याच्या चर्चेला अधिक जोर आला. दोघांनी एकत्रित यावे असे सर्वच मराठी माणसांना वाटू लागले आहे. पण टाळी कोणी प्रथम द्यावी याचीही चर्चा रंगली. त्यातच तोंडावर आलेल्या महापालिका निवडणुकांमुळे मुंबईची अस्मिता जागी झाली आणि मनसैनिकांनी-  शिवसैनिकांनी या चर्चेला फोडणी द्यायला सुरुवात केली. असे जरी असले तरी राज आणि उद्धव एकत्र येणार का! असा प्रश्न सर्वांसमोर आजही उभा आहेच. कारण ज्या कारणाने राज शिवसेनेतून बाहेर पडले ते पूर्ण होणार का! हा पहिला प्रश्न आहे. तर दुसरा प्रश्न आहे की मागील विस वर्षात राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात निर्माण केलेलं स्वतःचे अस्तित्व अबाधित राहणार आहे का! ही सारी वास्तवता पाहता राज- उद्धव एकत्रित येणार ही फक्त आणि फक्त चर्चाच असेल असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. कारण एकत्र यायचं असेल तर दोन्ही भावांचे थेट बोलणे झाले असते. 

       मराठी माणूस म्हटला की एखादे काम करण्यापेक्षा तो त्या कामाची चर्चा अधिक करतो. किंबहुना व्यावसायिक सोडून इतर विषयांवर चर्चा करण्यात मराठी माणूस नेहमीच आघाडीवर असतो. मग ती चर्चा कोणाच्या कुटुंबातील खासगी असो, गावातील ग्रामपंचायतीची असो, शाळेची असो किंवा राजकारणाची असो  मिळेल त्या ठिकाणी तो उभा राहुन थकेपर्यंत या विषयांवर चर्चा करत असतो आणि सातत्याने प्रश्न उपस्थित करीत असतो. या चर्चेतून तो उत्तर कधीच शोधत नाही. यामुळेच या साऱ्या चर्चा निरर्थक निष्फळ ठरतात. त्यातून निष्पन्न असे काहीच होताना दिसत नाही.  सध्या महाराष्ट्रात अशाच एका निरर्थक चर्चेने जोर धरला आहे. म्हणे राज आणि उद्धव ठाकरे एकत्रित येणार!  या दोघांच्या एकत्रित येण्याची चर्चा महाराष्ट्राच्या चांदा पासून बांदा पर्यंत जोर धरू लागली आहे. मुळात या दोन भावांचे सुरुवातीपासून राजकारण पाहिले तर हा विषय काही लहान नाही आणि नवीन नाही. 30 वर्षे जुना आहे. त्यामुळे एखाद्या लेखात हा विषय आटोपणे शक्य नाही आणि इतक्या सहजपणे  दोघे भाऊ एकत्र येणे तेही शक्य नाही. तसे पाहिले तर महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती पासूनच ठाकरे या नावाची चर्चा आणि दरारा आहे. कणखर आणि कडवड बोलणारे प्रबोधनकार ठाकरे यांचा धसका त्यावेळी साऱ्यानिच घेतला होता. त्यानंतर बाळासाहेबांनी उघडपणे मराठी माणसांसाठी पुकारलेल्या आंदोलनामुळे अल्पावधीतच बाळासाहेब ठाकरे मराठी माणसांच्या गळ्यातील मुकुटमणी झाले. बाळासाहेबांच्या आक्रमक भूमिकेमुळे संपूर्ण देशाने बाळासाहेब नावाचा धसका घेतला होता. यामुळेच मराठी माणसांनी बाळासाहेबांच्या हाती 1985 साली मुंबईच्या सत्तेची चावी दिली. परंतु निवडून आलेल्या बाळासाहेबांच्या अनुयायांनी बाळासाहेबांच्या धोरणाचे ज्या पद्धतीने पालन करावयास हवे होते ते केलेच नाही. बाळासाहेबांच्या निवडून आलेल्या अनुयायांनी परप्रांतीयांशी अर्थव्यवहार करीत मोठ्या प्रमाणात मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार केला. त्यामुळे बाळासाहेबांनी मराठी माणसांसाठी पाहिलेले स्वप्न जवळपास भंग झाले. इथेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात पाहिली ठिणगी पडली.  कारण काँग्रेस च्या सोबतीने शिवसेनेचे नगरसेवक करीत असलेल्या भ्रष्टाचाराला आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या अनधिकृत झोपडपट्टीला आळा घालावा असे स्पष्ट मत राज ठाकरे यांचे होते. भविष्याच्या दृष्टीने राज ठाकरे यांचे म्हणणे योग्य होते. यासाठी राज ठाकरे यांनी 1992 - 95 च्या काळात मुंबईची 'ब्लु प्रिंट' तयार केली आणि बाळासाहेबांना दाखविली बाळासाहेबांनीही ती मान्य केली होती. यामुळे निवडून आलेले नगरसेवक आणि या नगरसेवकांच्या मदतीने आपलेही हात ओले करणारे शिवसेनेचे पदाधिकारी हादरले  - बिथरले.  भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या याच नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी आपल्या पंखाखाली घेतले. या बदल्यात निवडून आलेल्या या नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व स्वीकारले. याच दरम्यान बाळासाहेबांनी स्वीकारलेल्या हिंदुत्ववादी धोरणामुळे ठाकरे या नावाची चर्चा देशात आणि विदेशातील घराघरात पोहचली. परिणामी आपसूकच शिवसेनेचा व्याप वाढत गेला आणि बाळासाहेबांनी महाराष्ट्राची जबाबदारी राज आणि उद्धव यापैकी एकाजवळ देण्याचे ठरविले होते. परंतु राज यांच्या हाती शिवसेना पक्ष गेला तर आपले काही खरे नाही असे निवडून आलेल्या बहुतांश भ्रष्टाचारी खासदार, आमदार, नगरसेवक आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी वाटू लागले. म्हणूनच हे सारेचजण उद्धव यांच्या पाठीशी राहिले त्यामुळेच उद्धव यांच्याजवळ पक्षाची धुरा सहजच चालत गेली. राज ठाकरे यांच्या हाती शिवसेना पक्ष न देणे हे उद्धव यांच्या कुटुंबाची जितकी इच्छा होती त्याला या साऱ्या पदाधिकाऱ्यांची साथ मिळाली. तरीही राज ठाकरे यांनी संयम राखला. राज यांचे स्पष्ट मत होते की शिवसेना पक्षाची जबाबदारी माझ्याजवळ द्यावी आणि उद्धव ठाकरे यांनी राजकारणात उतरावे आणि सत्तेची जबाबदारी घ्यावी. अनेकांचे म्हणणे असेच होते किंबहुना बाळासाहेबांचेही म्हणणे हेच होते. कारण पक्ष बांधणीबाबत उद्धव यांचा तितकासा आवाका नव्हता असे त्यावेळी सर्वांनाच वाटत होते.   आज ते सारे सत्यात उतरले. उद्धव ठाकरे यांनी पक्षावर योग्य ती पकड न बसविल्याने आज  भाजपाच्या सोबतीने उद्धवच्या जवळच्याच शिवसेनेच्याच नेत्यांनी शिवसेनेची   वाताहत केली. हे नेते बाळासाहेबांची शिवसेनाच घेऊन पळाले.  हे सारे गलिच्छ राजकारण पाहता राज ठाकरे यांच्याकडे शिवसेना पक्षाची जबाबदारी दिली असती तर योग्य झाले असते.  एकनाथ शिंदे यांनी हे धाडस केले नसते.  असे अनेक शिवसैनिक आणि मराठी माणसांना आज वाटू लागले आहे.  ते खरेही आहे. जर पक्षाची जबाबदारी राज ठाकरे यांच्याकडे आली असती तर राज यांनी शिवसेना पक्षात सुभेदार निर्माण केलेच नसते. पण पक्षाची कोणतीच जबाबदारी त्यावेळी राज ठाकरे यांच्याजवळ दिली नाही.  त्यामुळे राज यांना शिवसेना सोडून बाहेर जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. नारायण राणे यांची कोंडी करून त्यांना बाहेर जाण्यास प्रवृत्त करण्यास उद्धव ठाकरे आधीच यशस्वी झाले होतेच. तोच फार्मुला उद्धव ठाकरे यांनी राज यांच्याबाबतीत वापरला आणि राज यांना बाहेर जावे लागले.  यामुळे ठाकरे कुटुंब राजकारणात पूर्णतः दुभंगले गेले. याचा परिणाम असा झाला की बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर बाळासाहेबांचा करिष्मा,  त्यांनी निर्माण केलेला दरारा हळूहळू संपुष्टात येऊ लागला. याच संधीचा गैरफायदा घेत सुरुवातीपासून ठाकरे यांच्या शिवसेनेवर राग असलेल्या भाजपाच्या काही मोजक्याच नेत्यांनी ठाकरे नावाचा चेष्टेचा विषय केला. राजकारणात ज्यांना स्थान नाही असे नेतेही ठाकरे यांच्या नावाचा शिमगा करू लागले. 2014 पासून भाजपा सत्तेवर आल्यावर या प्रक्रियेला सुरुवात झाली. यामागे केवळ एकच उद्देश होता की महाराष्ट्र आणि मुंबई आपल्या ताब्यात मिळवायची असेल तर ठाकरे हे नाव प्रथम संपुष्टात आणायला हवे. त्याच दृष्टीने भाजपाच्या काही नेत्यांनी पावले उचलायला सुरुवात केली. परंतु  मागील दहा वर्षात महाराष्ट्रातील कडवट मराठी माणसांनी आणि महाराष्ट्र प्रेमी इतरांनी भाजपाचा हा कुटील डाव ओळखला आणि भाजपाच्या हाती महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या  चाव्या पूर्णतः दिल्या नाहीत. शिवसेनेचे बोट पकडून महाराष्ट्रात प्रवेश केलेल्या भाजपाला एकहाती सत्ता द्यावी हे शिवसैनिक, मनसैनिक आणि मराठी माणसांना कधीच पटले नाही.  असे असले तरी  मराठी माणसे आणि कार्यकर्ते काहीच करू शकत नव्हते कारण दोन भावांमधील असलेला वाद म्हणा.. इगो म्हणा.. आडवा येत होता  विशेषतः उद्धव ठाकरे यांचा इगो मोठ्या प्रामाणात आडवा येत होता असे म्हटले तर त्यात चुकीचे ठरणार नाही. याच इगोमुळे मराठी माणसांचा, मुंबईतील धाक हळूहळू कमी झाला.


▪️एकत्रित येणार म्हणजे काय!


राज आणि उद्धव एकत्रित येणार या चर्चेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एकत्रित येणार म्हणजेच नक्की काय करणार असा प्रश्न अनेकांसमोर निर्माण झाला आहे. मुळात एकत्र येणार म्हणजे उद्धव आपला पक्ष मनसे मध्ये विलीन करणार की राज आपला पक्ष उद्धव यांच्या शिवसेनेत विलीन करणार हा प्रश्न आहे. दोघा भावांचा स्वभाव पाहता हे पक्ष एकमेकात विलीन कधीच होणार नाहीत.  म्हणजेच राहिला प्रश्न मनसे आणि शिवसेनेची युती होणार की नाही. ही युतीचीही शक्यता फारशी नाही म्हणण्यापेक्षा नाहीच असे म्हटले तर योग्य ठरेल. कारण युती होण्यासाठी प्रथम दोन भावांची मने जुळली पाहिजेत आणि या दोन भावांची मने जुळली तरच युती होईल. पण आजपर्यंतचे राजकारण पाहता या दोन भावांची मने जुळणे फार कठीण आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे युती झाली तर राज ठाकरे नक्कीच आपला रुबाब दाखवतीलच आणि युतीत आपला दराराही ठेवतील. राज ठाकरे यांचा हा दरारा भ्रष्टाचारात गुरफटलेल्या शिवसेनेच्या किती लोकप्रतिनिधीना आणि पदाधिकाऱ्यांना  मान्य होईल असाही प्रश्न आहे.  जिथे उद्धव ठाकरे यांनाच हे मान्य होणार नाही तिथे शिवसेना नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना हे कसे मान्य होईल हा प्रश्न आहेच. त्यातच आदित्य ठाकरे  आणि पडद्यामागील असलेली महाशक्ती यांचा शिवसेना पक्षात वाढलेला हस्तक्षेप पाहता राज ठाकरे हे मान्य करणार का! असाही प्रश्न आहे. मनसे हा संपलेला पक्ष आहे असे आदित्य ठाकरे यांनी वारंवार सांगितलेले आहे. हे सारे पाहता राज आणि उद्धव एकत्रित येणार हि केवळ आणि केवळ चर्चाच ठरणार आहे. आणि हि चर्चा म्हणजेच येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्व भूमीवर एकमेकांवर केलेली कुरघोडी आहे असेच म्हणावे लागेल. कसे ते पहा..मराठी माणसांची मते मिळविण्यासाठी प्रत्येक निवडणूच्या तोंडावर राज ठाकरे  उद्धव यांच्या शिवसेनेकडे टाळी मागत होते. राज यांच्या या टाळीला उद्धव ठाकरे यांनी कधीच प्रतिसाद दिला नाही. यामुळेच  निवडणुकांच्या प्रचारात मनसे असे वातावरण निर्माण करीत होती की मराठी माणसांसाठी आम्ही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे टाळी मागितली परंतु उद्धव यांनी टाळी दिलीच नाही असे सांगून मराठी माणसांच्या भल्यासाठी उद्धव ठाकरे एकत्र येण्यास तयार नाहीत असा आरोप केला जात असे. येणाऱ्या मुंबई ठाणे नाशिक नवी मुंबई पालिका निवडणुकीत मनसे यांनी हाच टाळी चा मुद्दा पुढे करीत प्रचार केला असता. पण उद्धव ठाकरे यांनीच प्रथमच टाळी चा हात पुढे करीत राज ठाकरे यांना कोंडीत पकडले आहे. उद्धव ठाकरे इथेच थांबले नाहीत तर त्यांनी असेही सांगितले की मराठी माणसांच्या भल्यासाठी आम्ही एकत्रित येऊ महाराष्ट्राच्या जे मानत आहे ते होईल. उद्धव याच्या या धोरणामुळे यामुळे राज ठाकरे आता पूर्णतः अडचणीत सापडले आहेत.  मराठी माणसांसाठी, महाराष्ट्रासाठी आणि मुंबईच्या अस्मितेसाठी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रतिसाद दिला नाही तर राज ठाकरे यांचा मनसे पक्ष अडचणीत येईल आणि त्याचा परिणाम पालिका निवडणुकीत मनसे यांच्या उमेदवारावर होण्याची जास्त शक्यता आहे. कारण  कोणत्याही परीस्थितीत मुंबई महापालिकेची सत्ता मिळविण्यासाठी भाजपा मोठी यंत्रणा उभी करणार आहे. यामुळे भाजपाच्या हाती सत्ता गेली तर मुंबई, ठाण्याचे महापौरपद परप्रांतीयांच्या पदरात गेले  तर मराठी माणूस एकनाथ शिंदे यांना माफ करणार नाहीच पण राज ठाकरे यांच्याबाबतही मुंबईत नाराजी निर्माण होईल हे विसरून चालणार नाही. किंबहुना मुंबई आणि ठाणे येथील महापौरपद परप्रांतीयांच्या हाती जाणे हे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनाही आवडणार नाही. शिंदे आणि राज यांच्या राजकीय अस्मितेलाच धक्का लागेल. तरीही एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यावर दबाव टाकीत भाजपा पालिका निवडणुकीत हा सारा खेळ खेळण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठीच मुंबई महापालिकेत एकनाथ शिंदे यांच्याशी भाजपाने युती केली नाही तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण उद्धव यांच्या शिवसेनेच्या मतांची विभागणी कशी होईल हे भाजपाकडून पाहिले जाणार आहे. त्यात मनसे यांनी स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी केली तर उद्धव यांच्या शिवसेनेच्या मतांची आणखी विभागणी होईल. मराठी माणसांची मते तीन गटात विभागाली गेली तरच मुंबई आणि ठाणे महापालिकेत भाजपाला निश्चितच संधी मिळू शकेल. तरीही भाजपावर आधीच संतप्त झालेला मुंबईकर मराठी माणूस भाजपाला ही संधी देणार नाही याची खात्री भाजपाला असल्यानेच शिवसेना प्रेमी मराठी माणसांच्या मतांची विभागणी कशी होईल याकडेच भाजपाकडून लक्ष दिले जाईल. ही निवडणूक लोकसभा किंवा विधानसभेची नाही आहे. ही निवडणूक आहे ती मराठी माणसांची अस्मिता जपलेल्या  मुंबई आणि ठाणे शहरांची आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना या निवडणुकीत भाजपाचा दबावाला बळी न पडता कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण 

     मुंबई आणि ठाणे महापालिकेत महापौर पदामुळे मराठी माणसांचा अस्मितेचा प्रश्न जर निर्माण झालाच तर त्याचे खापर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यावर फोडले जाईल यात अजिबात शंका नाही.


▪️ठाकरे - शिंदे एकत्रित येणार!


     आयत्या पिठावर रेघोट्या मारणारा मी नाही असे म्हणत राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची जबाबदारी घेण्यास स्पष्ट नकार दिला होता. असे असले तरी मुंबईचा ठाण्याचा प्रश्न निर्माण होतो आणि  महत्वाच्या पालिकेची सत्ता परप्रांतीय काबीज करण्याची स्वप्ने बघू लागतात तेव्हा उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या जबाबदारीत वाढ झाली आहे.  एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना दूर लोटत असल्याचे वारंवार दिसत आहे. यामुळे शिंदे यांना आपले राजकीय अस्तित्व शाबूत ठेवायचे असेल तर महापालिका निवडणुकीत राज ठाकरे यांच्या सोबत युती करावीच लागेल. किंबहुना देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव टाकण्यासाठी शिंदे राज ठाकरे यांचा नावाचा वापर करतील. काहीही होवो पण मुंबई आणि ठाणे मराठी माणसांच्या हातून जाऊ नये अशीच रणणिती उद्धव ठाकरे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे यांची असेल कारण या सर्वाना बाळासाहेब ठाकरे या नावाची भीती आहे. म्हणूनच ईडी किंवा कोणत्याही तत्सम यंत्रणाच्या दबावाला बळी न पडता मुंबई आणि ठाणे मराठी माणसांच्या हाती कसे राहील हेच यांना पहावें लागेल. राज आणि उद्धव एकत्रित येणे किंवा न येणे हे महत्वाचे नसून मुंबईतील मराठी अस्मिता कशी टिकेल हे सर्वात महत्वाचे आहे.

 सौजन्य लेख : - सुरेंद्र मुळीक,

जेष्ठ पत्रकार, मुंबई.


Batmikar
बातमीकार

Most Popular News of this Week