
ख्रिस्ताचा पवित्र दिवस !!
शत्रूवर ही प्रेम करा!
जगभरात सर्वत्र गुड फ्रायडे काल साजरा करण्यात आला. ख्रिस्ती धर्मीयांन साठी खूप महत्त्वाचा पवित्र दिवस, हा दिवस जगभरात तसेच भारत देशातही साजरा केला जातो. खूप महत्वाचा प्रश्न. येशु ख्रिस्ताला सुळावर चढविले तो दिवस शुक्रवार होता. मग हा दुःखाचा दिवस असुन शुभ शुक्रवार कसा?
प्रभू येशू ख्रिस्ताला आज क्रुसावर चढविले होते. एवढेच काय ज्या रोमन शिपायांनी त्यांना क्रुसावर चढविले होते, येशूच्या छातीत निर्दयपणे भाला भोसकून तो नक्की मृत झाला आहे ना, याची खात्रीही केली होती. (योहान अध्याय१९वचन२४) तरीही या दिवसाला जगभरात ख्रिस्ती लोक शुभ शुक्रवार - गुड फ्रायडे म्हणतात, का बरे?
कारण हा दिवस इतिहासातील येशू ख्रिस्ताच्या जीवनातील सत्कथेच्या परमोच्च बिंदूकडे घेऊन जातो. या दिवशी येशू ख्रिस्तापूर्वी होऊन गेलेल्या संदेष्टयांनी वर्तवलेली येशू विषयीशी सर्वात महत्वाची भविष्यवाणी पूर्ण झाली होती. कोणतीही चूक, कोणतेही पाप न केलेल्या परमेश्वराच्या पुत्राला माणसांनी सुळावर चढविले. मग हा शुक्रवार शुभ कसा ? याचे उत्तर बायबलच्या नवा करारातील चार शुभ वर्तमानात आहे.
येशूच्या बारा शिष्यापैकी फक्त मार्क लूक, आणि योहान यांनी येशूच्या मृत्यूनंतर व पुनरुत्थानानंतर अनेकवर्षांनी त्यांचे चरित्र लिहुन ठेवले आहे. त्यानुसार मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी त्यांचे शिष्य जेव्हा त्यांच्या मृतदेहाला सुगंधी मसाले लावण्यासाठी त्यांच्या कबरीजवळ गेले, तेव्हा उभ्या असलेल्या एका दिव्य आकृतीने (देवदूत) त्यांना विचारले, तुम्ही येशूला शोधीत आहात का? तुम्ही जिवंतांचा शोध मेलेल्यात का करता? तो तुमच्या आधीच गालील गावा मध्ये त्याने मृत्यू पूर्वी सांगितल्यानुसार गेलेला आहे. (बायबल: लूक २४ वा अध्याय वचन ५ व ६) येशूने मृत्यूला शांत पणे सामोरे जाऊन, मृत्यूवर विजय मिळवून तो पुनरुत्थानीत झाला. म्हणून शुभ शुक्रवार या दिवसाला शुभ शुक्रवार म्हटले जाते.
अनेकांचा येशूच्या या पुनरुत्थावर विश्वास बसत नाही.
परंतु येशु ख्रिस्ताने त्यांच्या १२ शिष्यासह सुमारे ५००पेक्षा अधिक लोकांना दर्शन दिले. हिंदू धर्माचे महान प्रसारक योगी परममहंस योगानंद यांनी ही या गोष्टीची साक्ष दिली आहे. त्यांच्या "ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी या पुस्तकाला डॉ. डब्लू वा इव्र्हेन्स व्हेंटस् यांची प्रस्तावना आहे. स्वामींनी या ग्रंथाच मराठी आवृतीतील प्रश्न क्र. ६७८ व ६७९, या पृष्ठावर स्वतःला झालेल्या प्रभू येशूच्या दर्शनाचा वृतांत दिला आहे.
येशु ख्रिस्ताच्या १२ शिष्यांपैकी एक थॉमस याने येशूच्या पुनरुत्थानावर संशय घेतला एकदा त्यांचे शिष्य व थॉमस प्रार्थना घरात प्रार्थना कडीत असताना खोली बंद होती अचानक प्रभू येशु तेथे प्रकटले आणि थॉमस ला जवळ बोलावले व जिथं रोमन शिपायाने आपल्या छातीमध्ये ज्या ठिकाणी भाला भोसकला होता, तिथे त्याचे बोट लावले आणि विचारले आता तरी विश्वास ठेवतोस का? थॉमस सग्दतीत म्हणाला माझा प्रभू माझा देव, माणसाच्या संशयित प्रवृत्तीला ओळखून येशूने थॉमस या आपल्या शिष्याला म्हटले, आता तू पाहिले म्हणून विश्वास ठेवला आहे. परंतु जे न पाहता विश्वास ठेवतात ते धन्य.
येशूचे मृतातून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणे व अनेकांना दर्शन देणे, हे त्याचे देवत्व व अमरत्व सिद्ध करते. पण त्याही पलीकडे हे सत्य हा शुक्रवार सिद्ध करतो ते म्हणजे सत्याचा असत्यावर विजय प्रेमाचा द्वेषावरील विजय. कारण क्रुसखांबाव आपली अंतिम घटिका मोजत असताना या दिव्य महात्म्याने ' हे देवा, यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना कळत नाही (अध्याय २३ वचन ३४) असे म्हटले होते.
आज सुसंस्कृत जगाला दहशतवाद्यांच्या माध्यमातून वेठीस धरले जात आहे. अशावेळी आपल्या मारेकऱ्यांनाच क्षमा करावी, म्हणून परमेश्वराकडे याचना करणारा येशु केवळ आकाशापर्यंतच उंच होत नाही तर स्वर्गापर्यंत उंच होत आहे.
येशूने त्यांचे संपूर्ण जीवन मानवाला जीवनाचे खरे ध्येय सांगण्यात घालविले. जे तुमचा द्वेष करतात त्यांच्यावर प्रेम केले तरच ते दिव्य प्रेम, नाहीतर आपल्यावर प्रेम करणाऱ्यांवर प्रेम करणे हा व्यवहार झाला.
देवाचा पुत्र येशूला मरण यातना भोगायला लावून दृष्ट लोकांनी त्याला क्रुसावर खिळले. (मारले)
तो शुक्रवारचा दिवस होता. त्यांनंतर तिसऱ्या दिवशी प्रभू येशू पुन्हा जिवंत झाला आणि चाळीसाव्या दिवशी तो शरीरासहीत स्वर्गात गेला.
पुढे ख्रिस्ती धर्म येशूच्या शिष्यांकडून जग भरात पसरला. म्हणून येशूच्या मरणाचा दिवस 'गुड फ्रायडे' म्हणजे 'शुभ शुक्रवार' म्हणून ओळखला जातो.
पापी लोकांपासून जगाला वाचविण्यासाठी प्रभू येशूने क्रुसावरील मरण यातना सहन केल्या.
क्रुसावरील मरणाला सामोरे जाऊन "क्षमा, सहनशीलता आणि त्याग" हा मंत्र जगाला दिला. या शिकवणूकीमुळेच जग आजवर टिकून आहे हा ख्रिस्ती लोकांचा विश्वास आहे. म्हणून हा शुभ शुक्रवार.
क्रुसावरील मरणानंतर प्रभू येशू तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाले तो दिवस जगभरात ईस्टर सण म्हणून साजरा केला जातो. येशू मरणातून पुन्हा उठला कारण तो सर्वसामान्य मनुष्य नव्हता तर तो देवपुत्र होता. त्या मृत्यूंजय ख्रिस्ताचे पृनरूस्तान हेच ईस्टर सणाचे महत्त्व आहे.
आज संपूर्ण जगात दुःखी लोकांचे अश्रू पुसणाऱ्या, आजाऱ्यांची सेवा करणाऱ्या, मृत्यूच्या दारी असलेल्याना, युद्धातील जखमींना, भुकेल्याना अन्न देणाऱ्या, गरीबांची सेवा करणाऱ्या, असंख्य संस्था व्यक्ती , जे अफाट प्रयत्न करीत आहेत, त्या मागे उभे आहे, त्या येशु ख्रिस्ताचे संपूर्ण मानव जातीच्या उद्धारासाठी केलेले क्रुसावरचे समर्पण !
त्या महान करुणामयी, प्रेममयी देवपुत्रास आज त्यांच्या पुनरुत्थान दिवसा निमित्त (ईस्टर) सणाच्या माध्यमातून शतशः नमन
हॅपी ईस्टर
प्रीती तिवारी